Thursday, April 1, 2021

ओळख पक्ष्यांची - हरियाल


 आपल्या महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून ओळखाला जाणारा राज्यपक्षी म्हणजेच हरीयाल पक्षी होय.हा कबूतरवंशीय पक्षी असून  याला  हरीतालिका,पिवळ्या पायाचा होला,हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे.  पाचू-कवडा नावाचे जे कबूतर आहे त्याच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालच्या अंगावर असतात.हरियाल म्हणजे सोप्या भाषेत हिरवे कबुतर. शहरात दिसणाऱ्या कबुतरांचा हा नातेवाईक असला, तरीही स्वभावाने खूपच निराळा आणि रंग रूपाने देखणा असा हा पक्षी आहे.हिरवा कबूतर हा विविधतेने नटलेला पक्षी असून त्याचा आकार नेहमीच्या कबूतरांपेक्षा थोडा लहान आहे.हा पक्षी विदर्भातील शुष्क पानगळीच्या जंगलात व सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये नेहमी आढळून येतो.दिवसभर खाद्यासाठी हिंडून झाल्यावर सायंकाळी हे पक्षी समूहाने वड किंवा पिंपळाच्या झाडावर मुक्काम करतात.या पक्ष्यांना जमिनीवर बसायला आवडत नाही.गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीची झाडे. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. पक्षीनिरीक्षणांच्या वेळी हरियाल सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसल्याच्या नोंदी सापडतात. म्हणून या पक्ष्याला विहारासाठी सकाळ आवडत असावी असे दिसते.

                 मध्यवर्ती भारतापासून ते उत्तरेकडील सर्व राज्यांत याचा वावर आहे. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब व आसाम अभयारण्यांतून दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही हरियाल सापडतो.

 हरियाल हा कबुतरासारखाच घुमतो. कधीकधी चिर्र... चिर्र... आवाज करत फिरतो. नर आणि मादी हरियाल यांच्यात बाह्यतः फरक दिसत नाही.महाराष्ट्रात  हा पक्षी आनंद सागर, शेगाव,जिल्हा बुलढाणा येथे पण आढळतो.

                    विणीचा हंगाम मार्च ते जून महिने या कालावधीत असतो. या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यांत हे पक्षी अंडी घालतात. या काळात पावसाळ्यात घनदाट जंगलात, उंच झाडावर कबुतराप्रमाणे घरटी साकारुन नव्या पिढीला जन्म घालतात.हिरव्या -पिवळ्या रंगाचे  पंख,नारंगी गळापट्टी,खांद्यावर विटकरी छप्पा,उठून दिसणारे पिवळे पाय या वैशिष्टयामूळे हा पक्षी ओळखता येतो.पावसाळ्यात त्यांच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्यामुळे हे पक्षी पश्चिम महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात काही दिवसांसाठी स्थलांतर करुन येतात व पावसाळ्याअंती परत आपल्या मूळ स्थानी परततात.वृक्षतोडीमुळे हरियाल पक्षी आपली मूळची वास्तव्याची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधताना दिसतात. यांचा अस्तित्वाचा धोका उत्पन्न झाला आहे. या पक्ष्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची जोपासना करणे आवश्यक आहे.त्यांना प्रिय असलेल्या वड-पिंपळ वृक्षांची लागवड करुन जोपासना केली पाहिजे.

No comments: