माळढोक पक्षाच्या मराठी नावातच त्याच्या निवासचं ठिकाण सामावले आहे. माळरानावर रहाणारा हा मोठा पक्षी खरतर माळरानाची शान म्हणावा असाच असतो.हा गवताळ माळरानावर सापडणारा एक राजबिंडा पक्षी आहे. या पक्ष्याला विगर्स या शास्त्रज्ञाने १८३१ साली जगासमोर आणले. मराठीत या पक्ष्याला ‘माळढोक’ असे अतिशय समर्पक नाव मिळाले आहे. माळावर सापडणारा ढोक,मोठा बगळा म्हणजे ‘माळढोक’ योगायोगाने याच्या शास्त्रीय नावाची फोड म्हणजे मोठय़ा बगळ्यासारखा दिसणारा माळावरचा पक्षी अशीच होते. पण गंमत म्हणजे या पक्ष्याचा आणि बगळ्याचा दूरान्वयेही संबंध नाही.
हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत 'ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ’हुम’ म्हणतात.माळढोक हा भारतातील राजस्थान राज्याचा राज्य पक्षी आहे. मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे.
माळढोक प्रामुख्याने भारताच्या शुष्क भागातील गवताळ माळरानावर राहणारा पक्षी आहे. त्याला खुरटय़ा गवताचे ओसाड आणि निर्जन माळ आवडतात; जिथे त्याला दूपर्यंत दृष्टिक्षेप टाकता येतो. बहुतांशी अशा ठिकाणी माणसांचा आणि पाळीव जनावरांचा वावर कमी असतो.
मोकळ्या रानमाळ, गवताळ जमिनी आणि साधारण शेतीच्या सान्निध्यात रहाणारे हे पक्षी गिधाडांपेक्षा थोडे मोठे असतात. साधारण लहान शहामृगाच्या आकाराएवढा हा पक्षी अंदाजे तीन फ़ूट उंच असतो. नराची मान ही गव्हाळ रंगाची असते आणि त्याच्या मानेखालील शरीरावर काळे हलके पट्टे असतात.मादीच्या मानेचा रंग नरापेक्षा थोडा वेगळा असतो आणि मानेखाली काळे पट्टे नसतात. उडणारा सर्वात जास्त वजनदार पक्षी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या ह्या पक्ष्याच्या अंगभर मातकट तपकिरी रंग, डोक्यावरच्या पिसांचा असलेला काळा पट्टा, अंगावर मधेमधे दिसणाऱ्या काळ्या रेघा हे शरीर वैशिष्ठ्य म्हणता येऊ शकतं. याच जोडीला ह्याचे उंच व काटकुळे पाय सुद्धा नजरेत भरणारे असतात. मादीपेक्षा नर आकाराने मोठा असतो हेही विशेष.नराची चोच टोकदार असते. या पक्ष्याचे पाय १ फूट उंच असतात. याच्या पायाला तीन बोटे असतात. माळढोक पक्ष्याच्या बोटांना धारदार नखे नसल्यामुळे त्याला झाडावर बसता येत नाही.
माळढोक भित्रे आणि कमालीचे सावध असतात. ते वेगाने धावू शकतात आणि दूरवर उड्डाण करू शकतात.या पक्ष्याला काटेरी झुडपांचे माळरान राहयला आवडते.
याचा रंग माळरानाशी मिळता जुळता असल्याने त्याच्या संरक्षणास मदत होते. या पक्ष्याच्या खाद्याचा विचार करता हा टोळ, भुंगेरे व इतर कीटक, गोमा, पाली, सरडे यांबरोबरच धान्ये, भुईमुगाच्या व इतर वनस्पतींच्या शेंगा आणि बोरे यांचा समावेश त्यांच्या आहारात होतो. पाणी उपलब्ध असेल, तेव्हा माळढोक जमिनीवर बसून पाणी पिताना दिसतो. पिकावरील कोवळे तुरे, लहान आकाराची फळे, निरनिराळे धान्य उदा. – ज्वारी, बाजरी, करडी, सूर्यफूल तसेच निरनिराळे कीटक व अळ्या खातो.हा पक्षी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस आपले खाद्य शोधत असतो. दुपारचे वेळेस मात्र हा विश्रांती घेतो, हा एक जागृत पक्षी आहे.
आज जगात याच्या सुमारे २५ जाती सापडतात याचे सामाजिक जीवन अतिशय मनोरंजक आहे.हा पक्षी बहुभार्या आहे. पण पिल्लांच्या संगोपनात अजिबात भाग घेत नाही. मादी निर्जन ठिकाणी उघडय़ा जमिनीवर एक अंडे घालते आणि एकटीच उबवते. सुमारे २५ दिवसांनंतर अंडय़ातून पिल्लू बाहेर पडते. हे पिल्लू मग आपल्या आईबरोबरच फिरते आणि सुमारे ७५ दिवसांनी उडण्यासाठी सज्ज होते. सुमारे एक वर्षांने ते आईपासून स्वतंत्र होते. पण हा दीर्घकाळ चालणारा विणीचा हंगाम पिल्लांसाठी घातक असतो. अंडं उबवणीचे २५ दिवस आणि उडायला येईपर्यंतचे ७५ दिवस असे सुमारे १०० दिवस हे पिल्लांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जन्माला आलेल्या सर्व पिल्लांपैकी सुमारे ५०% पिल्ले याच काळात मृत्युमुखी पडतात आणि फक्त २५% पिल्लेच प्रौढ होईपर्यंत जगतात. या पक्ष्यांना मुख्यत्वेकरून दोन धोके आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष धोका आणि दुसरा म्हणजे त्यांचा नष्ट होणारा अधिवास. प्रत्यक्ष धोके मुख्यत: बेकायदेशीर शिकार, विजेच्या तारांना धडकून होणारे अपघाती मृत्यू, कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, भटक्या कुत्र्यांकडून होणारी पिल्लांची आणि प्रौढ पक्ष्यांची शिकार आणि गुरांच्या पायदळी तुडवले जाण्यामुळे होणारा अंडय़ांचा आणि पिल्लांचा नाश हे आहेत. दुसरा धोका म्हणजे त्यांचा नष्ट होणारा अधिवास. ही एक जटिल समस्या आहे. शेती आणि उद्योगधंद्यासाठी माळरानांचा मोठय़ा प्रमाणात नाश होत आहे. माळरानांच्या अयोग्य आणि अशास्त्रीय नियोजनामुळे ती आता संपुष्टात येत आहेत. माळढोकला लागणाऱ्या अधिवासाच्या फक्त १% माळरान आता संरक्षित आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार माळढोकची संख्या आता फक्त २५०-३०० इतकीच उरली आहे. त्यामुळेच याची गणना अतिसंकटग्रस्त पक्ष्यांमध्ये केली जात आहे. जर असेच चालू राहिले तर येत्या दशकात हा पक्षी नामशेष होईल, यात संशय नाही.त्याला आपल्या शत्रूची चाहूल लगेचच लागते. एका वेळेस १० ते १५ पक्षी एकत्र असतात.हा पक्षी ‘क टुकड’ असा आवाज करतो. या पक्ष्यास हिंदीमध्ये ‘टुकना’ असे म्हणतात. संस्कृतमध्ये या पक्ष्यास ‘महासारंग’ म्हणतात.तीन उपजाती भारतात आढळतात.याला वाचविण्यासाठी आतापर्यंत बरेच प्रयत्न केले गेले, ज्यात अधिवासाचे संरक्षण हा एक घटक होता. पण त्यांच्या सतत घटणाऱ्या संख्येमुळे आता बंदिस्त प्रजनन संरक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. परंतु हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांचा अधिवास महत्त्वाचा आहे. जर अधिवासाच नसेल तर हा पक्षी कोणीही वाचवू शकणार नाही.
माळढोकाचे वैशिष्ट्य हे की, तो जमिनीवर वावरत असला, तरी उड्डाणक्षम असा सर्वांत मोठा पक्षी आहे.शहामृग व एमू हे पक्षी उड्डाणक्षम नाहीत. माळढोक पक्ष्यांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना कायद्याने संरक्षण दिलेले आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्ये राखून ठेवली आहेत. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकूरी येथील माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य ही विद्यार्थ्यांसाठी आकर्षण केंद्रे आहेत. महाराष्ट्रात केवळ काही मोजके माळढोक शिल्लक राहिले असल्यामुळे त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत, यांमध्ये पक्ष्यांना रेडिओ कॉलर लावण्याचा समावेश आहे. डॉ.प्रमोद पाटील हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बरोबर काम करणारे पर्यावरण संरक्षण तज्ज्ञ माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.
नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ १,२२९ चौ.कि.मी इतके आहे.यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे. कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे.या पक्ष्याची आता महाराष्ट्रातली संख्या इतकी कमी झाली आहे की, त्यात वाढ होणं आणि त्यांचं पुनरुज्जीवन होण्याची शक्यता जवळपास संपली आहे.
No comments:
Post a Comment