Wednesday, April 7, 2021

ओळख पक्ष्यांची - नवरंग

'पावसाची बातमी देणारा पक्षी' असे नवरंग पक्ष्याला म्हणतात याचे दर्शन झाल्यावर शेतकरी आनंदित होतात.पावसाळा येऊ घातल्याची वर्दी देणाऱ्या पक्ष्यांमधला हा एक देखणा पक्षी. भारतात स्थानीक स्थलांतर करणारा हा नवरंग मे महिन्याच्या सुमारास महाराष्ट्राला भेट देतो. इतर वेळी जंगलात कधीच न दिसणारा हा पक्षी दिसायला लागला की समजावे हळूहळू आता पाउस हमखास येणार. इंग्रजीमधे याला इंडियन पिट्टा असे म्हणतात तर मराठीत याला नवरंग म्हणतात.

          याचा आकार साधारणत: मैने एवढा असतो पण ह्याची शेपुट एकदम आखुड असते किंवा जवळपास नसतेच.नवरंग म्हणजे भारतीय पिटा. या पक्षाची अन्य मराठी नावे बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशी आहेत.

                हा पक्षी भारतभर सर्वत्र दिसतो. तो भारतातील सर्व वनांत आणि झुडपी वनांत आढळतो व त्याच्या विणीच्या काळात म्हणजे, मे ते ऑगस्ट या काळात दिसतो. गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते.विविध प्रकारचे कीटक हे नवरंगाचे खाद्य आहे.झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करणारा हा पक्षी आपला बहुतेक वेळ जमिनीवर घालवतो. त्याचा व्हीट – ट्यू असा आवाज सकाळ संध्याकाळ ऐकू येतो. हा ढगाळ हवेत दिवसभर आवाज करतो.. हा सहसा जंगलामधे जमिनीवर पालापाचोळ्यामधे किड्यांकरता उलथापालथ करताना दिसतो. या पालापाचोळ्याखाली दडलेल्या अळ्या, मुंग्या इतर किटक यांना पकडून तो खातो. याकरता त्याच्या जाडसर चोचीने तो पानांची बरीच उलथापालथ करताना दिसतो. त्याचे दणकट असणारे पायही त्याला या कामात खुप मदत करतात. या दणकट पायांमुळेच त्याला जमिनीवर उड्या मारत चालता येते. याचे डोके फिकट पिवळसर रंगाचे असते आणि त्याच रंगाचे पोट असते.

              झुडपी, जंगले, पानझडी जंगले ही ठिकाणे आवडती असल्याने मुख्यत: या ठिकाणी जमिनीवर उडय़ा मारत फिरताना आढळतो. म्हणून त्यास भुचरपक्षीसुद्धा म्हणतात.

          पाठीवर हिरवा, निळा, पोटावर व डोक्यावर पिवळा, डोळय़ापाशी काळा, चोच लालसर, डोक्याचा खालचा भाग पांढराशुभ्र, पिसे हिरवी, निळी, लाल, नारंगी रंगाची अशा प्रकारे विविध रंग या पक्ष्याला असतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात.

             पर्यावरणाचे नैसर्गिकरीत्या संवर्धन करण्याचे कार्य करणारा पक्षी वर्ग हा निसर्गातील महत्त्वाचा दुवा आहे. परंतु, मानवाचा नैसर्गिक चक्रामध्ये होत असलेल्या हस्तक्षेपामुळे पक्षी वर्गातील अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. परिणामी, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.

             बेसुमार जंगलतोड, हवा-पाणी-वायू प्रदूषण या मुळे पक्ष्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नैसर्गिक संकटांना तोंड देत हे पक्षी स्थलांतर साधत असतात. प्राणी गटातील सर्वात यशस्वी गट म्हणून पक्ष्यांना संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे स्थलांतर आणि परिस्थितीशी जमवून घेणे. मात्र मानवाच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या अधिवासावर दिवसेंदिवस गंडांतर येत आहे हेच खरे.

 

No comments: