चिऊताई,चिऊताई
माझ्या अंगणात ये
चोचीतला खाऊ तुझा
दे गं मला दे
सर्वांच्याच बालपणीतला आठवणीतला पक्षी म्हणजे चिऊताई.आपल्या आयुष्यात सर्वात पहिल्यांदा ताई म्हणून कोणाचे नाव कानावर पडले असेल तर ते चिऊताईचे.कुठे तरी प्रत्येकाचे बालपण चिऊताईच्या आठवणींशी जोडले गेले आहे. अनेकांचे जेवण चिऊताईच्या घासानेच सुरू झाले. दोन पायावर टुणूटुणू उड्या मारणारी चिमणी, तिचा चिवचिवाट, एवढ्याशा पाण्यात स्नान करताना त्यांचा असलेला उत्साह आता दुर्मिळ होत चालला आहे.
चिमणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे लोकवस्ती,शहरी भाग,इथे प्रामुख्याने आढळणारा हा पक्षी जंगल,बागा,गवताळ मैदानापासून अगदी वाळवंट आणि बर्फाळ प्रदेशातही आढळतो.भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे.
चिमणी हा पक्षी १६ सेमी.लांबी आणि २० ते ३० ग्रॅम वजनाचा असणारा आहे.माणसांवर प्रेम करणारी चिमणीचा छोटा आकार, गब्दुल बांधा, आखुड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय, पण भक्कम कोणाकृती चोच ही चिमणीच ओळख आहे. चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रिय असल्याचे दिसते. माणसांवर प्रेम करणारे माणसाव्यतिरिक्त कोणी असेल तर ती चिमणी असते.
घर चिमणी व रानचिमणी (पितकंठी) असे महाराष्ट्रातील चिमण्यांचे दोन प्रकार आहेत. जगात चिमण्यांचे २८, भारतात सहा प्रकार असून जगात चिमणीसदृश ४३ पक्षी आढळतात. ही चिमणी चिमणी शिळेपाके अन्न, धान्य, कोळी, कीटक, नाकतोडे असे अन्न खाते. तसेच ती वर्षातून चार वेळा अंडी देते.
चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
चिमण्या पर्यावरणात न दिसण्याची पुढिल मुख्य कारणे आहेत. झाडांची मोठय़ा प्रमाणावर तोड झाली याचा परिणाम चिमणीला घरटय़ासाठी आवश्यक जागा कमी झाल्या. तसेच बंदिस्त नाले कीटकनाशकांचा वापर यामुळे पिलांना भरण्यासाठी लागणारे किडे, कृमी, कीटक यांची संख्या कमी झाली. ध्वनिप्रदूषण, खिडक्यांवर ग्लास पॅनलचा उपयोग आणि मोबाईल टॉवरची वाढती संख्या ही सर्व कारणे एकंदरीतच पक्षी जीवन धोक्यात आणणारी आहेत. मोबाईल टॉवरमुळे त्यांच्यातले कम्युनिकेशन बिघडते असा अभ्यास आहे.
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने आपण ठरवले तर काही विधायक कृती नक्कीच करु शकतो.चिमणी वाचविण्यासाठी घराजवळ, गच्चीवर धान्य, पाणी ठेवणे, अडगळीची जागा निर्माण करणे, खोपे तयार करून ठेवणे, कीटकनाशकांचा प्रमाणात वापर करणे. शिकार न करणे,कृत्रिम घरटी,पाणी पिण्यासाठी आणि बर्ड फिडरची सोय करणे. यामुळे चिमण्यांची संख्या वाढून पुन्हा त्यांचा चिवचिवाट ऐकून आजची मुले आणखी निसर्गाजवळ जातील, त्यांचा ताण नक्कीच कमी होईल
'चिमणी वाचवा' अभियानाची चळवळ पुन्हा जोर धरु लागली आहे.याचा सकारात्मक परीणाम म्हणजे थोड्याफार प्रमाणात चिमण्या पुन्हा दिसू लागल्या आहेत.
'गेलेल्या चिऊताईला
पुन्हा बोलवूया
पर्यावरण रक्षण्या
सज्ज होऊया'.
श्रीम. सुनिता भाऊसाहेब इंगळे ( सूर्यवंशी )
न.पा.शाळा क्र.६ कोपरगाव जि.अ.नगर
प्राथमिक शिक्षिका
मो.न.९८८१४६८८३८
No comments:
Post a Comment